जळगाव : वैशाली ही सरकारी बालगृहात वाढलेली मुलगी. लहानपणीच आई-वडिलांचे छत्र हरपल्याने जळगावच्या निरीक्षणगृहातच ती वाढली आणि सज्ञानही झाली. लहानपणी काळाचा खूप मोठा आघात सोसलेल्या वैशालीचे नवे आयुष्य आता सुरू झाले आहे. चितोंडा (ता. यावल, जि. जळगाव) गावच्या दीपक पाटील या मुलाने तिच्याशी विवाह केला आहे.
चार मे रोजी दुपारी १२ वाजून ३५ मिनिटांनी या दाम्पत्याने गृहस्थाश्रमात प्रवेश केला. एरव्ही केवळ शासकीय वास्तू म्हणून पाहिले जाणारे बालगृह गुरुवारी एखाद्या मंगल कार्यालयाप्रमाणे नटले होते. गजराच्या घंटेऐवजी तेथे सनई-चौघडे वाजत होते. खास जळगावच्या पद्धतीतील वरण, पोळी, वांग्याची भाजी असे सुग्रास भोजन होते. बालगृहाची वास्तूही जणू वैशालीच्या जीवनातील या आनंदाच्या क्षणासाठी नटली होती.
दीपक हा सुभाष गंगाराम पाटील यांचा सुपुत्र आणि वैशाली ही अमळनेर येथील सुभाष बाळकृष्ण दहिवदकर यांची सुकन्या. आई-वडिलांचे छत्र लहानपणीच हरपल्याने वैशाली जळगावच्या निरीक्षणगृहातच लहानाची मोठी झाली. तिचा भाऊ सौरभही बालगृहातच वाढतोय. जळगाव जिल्हा परीविक्षा आणि अनुरक्षण संघटनेतर्फे मुला-मुलींचे निरीक्षण गृह व बालगृह चालवले जाते. तेथे या मुलामुलींचे स्वतंत्रपणे संगोपन होते. सज्ञान झालेल्या वैशालीसाठी दीपकचे स्थळ आले आणि योग जुळला आणि ठरल्याप्रमाणे हे शुभमंगल यथासांग पार पडले.
समाजातील महिला व बालकल्याण क्षेत्रात काम करणाऱ्या विविध कार्यकर्त्या, महिला समाजसेविका आदींचीही या वेळी आवर्जून उपस्थिती होती. जिल्हा महिला बालविकास अधिकारी रमेश काटकर, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, अधीक्षक सारिका मेतकर, जयश्री पाटील, पांडुरंग पाटील आदी अधिकारी, तसे जिल्हा परीविक्षा व अनुरक्षण संघटनेचे सर्व सदस्य या सोहळ्याला उपस्थित होते. वैशालीची पाठवणी करताना बालगृहातील तिच्या मैत्रिणी, अधीक्षिका आणि बालगृहातील कर्मचारी अशा सर्वांचेच डोळे पाणावले होते. एकंदरीत या विवाहसोहळ्याच्या निमित्ताने गुरुवारी बालगृहाच्या शासकीय वास्तूने एक अनोखा कौटुंबिक सोहळा अनुभवला.